Friday, May 10, 2013

gampha

गम्फा 


         उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा असायची. दिवस भर आम्ही शेतातच असय्चो.  शेत नदीच्या काठाशी. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाणी असायच शेताला. जंगलातून बरेच प्राणी पाण्याच्या शोधात हमखास नदीला पाणी प्यायला येत. आणि येता जाता  शेताच नुकसान करत. म्हणून राखण करायला नेहमी एक गडी शेतात असे. कधी कधी मजा म्हणून आम्ही मुल पण रात्री जागली ला शेतात जात असु.  शेकोटी पेटवली कि प्राणी येत नसत. पण शेकोटी पाहून "तो" मात्र हमखास यायचा. 
राम राम हो …. अशी लांबूनच हाळी  देऊन "गम्फा" यायचा.

        या गम्फाची  मला फार भीती वाटायची. तो होताही भीतिदायक. अंगात पट्ट्या पट्ट्याचा  बिन  बाह्यांचा बनियन, दोन्ही खिसे भरून कसला तरी झाड पाला . खाली गुडघ्यापर्यंत धोतर. पायात कडक टायऱ्या. खेड्यात मोटर सायकल च्या टायर पासून चपला बनवतात. त्यांना टायऱ्या म्हणतात. राना वनात फिरतांना काटे वगैरे टोचू नयेत म्हणून याचा चांगला  वापर होतो. आणि  टाकाऊ टायर वापरून बनवलेल्या म्हणून खूप स्वस्त. आणखी म्हणजे विञ्चू वगैरे मारायला फार उपयोगि. गम्फाने  एकदा टायऱ्या ने साप मारल्याची कथाही गावात प्रसिद्ध आहे.  या शिवाय डोक्यावर पटका. त्याच्यात कसल्या तरी लहान लहान काडया खोचलेल्या.  कानाला अर्धवट वापरलेली विडी. कधी कधी त्याच्या पायाला म्हणजे पोटरी पाशी लहानशी दोरी गच्च बांधलेली. एका हातात झाड पाला. आणि दुसऱ्या  हातात कुऱ्हाड.  वयाने साधारण सत्तरीत असावा. पण अजूनही चित्त्या सारखा चपळ.

       याच खर नाव गणपत. याचाच पुढे गणपा, गम्पा आणि पुढे गम्फा  झाला असावा . आज पर्यंत हेच नाव त्याला चिकटलय. नावा प्रमाणेच बऱ्याच गोष्टीही त्याच्या बद्दल प्रसिद्ध आहेत. गम्फा जादू टोणा  करतो. नजर लावतो.  एकदा माझा मित्र अशोक सांगत होता … "या गम्फा पासून सावध राहायला पहिजे. त्याने मनात आणल तर होत्याच नव्हत  करू शकतो तो. पाटलाच्या म्हशीला दहा शेर दुध होत. पाटलाने या गम्फाचा अपमान केला कधी तरी. तेंवा यानं काय जादू केली देव जाणे  … म्हशीचं  दूधाच आटल. मग पाटलान ह्याला एक बकरी दिलि. तेंवा कुठे दुध सुरु झाल !"
लोक म्हणतात  त्याला  भूत नाथ प्रसन्न आहे.  तो दर अमावास्येला स्मशानात जाऊन पूजा करतो.  रात्री जंगलात जाऊन भूतांशी बोलतो. या सगळ्या गोष्टींमुळे लोक त्याला बिचकून असतात. विनाकारण कोणी त्याच्या वाट्याला जात नाही. लहान मुले त्याच्या दृष्टीत येऊ नयेत म्हणून प्रयत्न करतात. एवढच नाही तर गाईच नवजात वासरू देखील काही दिवस गोठ्यात आडोसा करून तिथे ठेवतात. वासरू झाल्यावर आधी गम्फाला दक्षिणा देतात आणि मगच त्याला उघड्यावर आणतात. त्याचा कोप होऊ नये म्हणून.  गम्फाही मग  काही तरी मंत्र म्हणतो आणि म्हणतो … कल्याण हो …

     गम्फाची माळाच्या पायथ्याशी झोपडी आहे. तिकडे फार कोणी फिरकत नाहि. कधी कोणी तिकडे गेला तरी गम्फा त्यांना भेटत नाही. तो फिरत असतो जंगलात. त्याची भेट होणार कधी तरी तो गावात आला किंवा शेतात आला तरच. शेतात आला कि लोक त्याला स्वतः होऊन कधी तुरीच्या शेंगा, कधी हरभरा तर कधी भुईमुगाच्या शेंगा देतात. उगीच ह्यानं नजर लावली तर पीक जाळून जाइल. एरवी तो काय करतो कुठे जातो याची कोणालाच काही माहिती नसते. किंबहुना कोणाला काही पडलेलीच नसते.

   अशा या उपेक्षित गम्फाची लोकांना एका वेळी मात्र हमखास आठवण येते. खेळता खेळता  एखाद पोर कधी अचानक आजारी पडल, किंवा चांगला कामाचा तरुण मुलगा हात पाय बांधून घरी बसला कि गम्फाला बोलावणं जात. भूत प्रेताची बाधा झालेली… गम्फा त्याच्यात एक्ष्पर्ट माणूस. बोलावणं जात म्हणजे काय  हाकाराच   उठतो.  आठ  दहा जण गम्फाला  शोधायला  बाहेर  पडतात. गम्फा रे …ए गम्फा … असा पुकारा सुरु होतो. मग कोणाला तो भेटला कि सापडला रे ... अशी हाळी देउन इतरांना सूचीत करतात. गम्फा मग  त्याचं सामान घेऊन येतो. अंगणात जाळ  करून मीठ मोहऱ्या जाळतो. कडू निम्बाचा रस करून त्या पोराला पाजतो. आणखी काही काड्या उगाळून चाटवतो. आणि तोंडाने काही तरी मंत्र पुट पुटतो. आणी सगळ्यांना सांगतो "वाईट वेळ आली होती. पण आता टळली आहे… सकाळी पोरग उठून बसणार". आणि चमत्कार म्हणजे तस होतही. मग घरचे त्याला पायली भर ज्वारी देतात. आणि तोही आशीर्वाद देतो
. . . . कल्याण हो . . .

    एकदा मी आणि माझा मित्र जंगलातल्या तळ्यात गेलो होतो पोहायला. कोणाचा तरी किंचाळण्याचा आवाज आला … म्हणून त्या दिशेने धवलो. शेळ्या चारणाऱ्या मन्याला साप चावला होता. गाव तिथून  खूप दूर होत. काय कराव कळेना. इतक्यात तिथे गम्फा आला. तोही आवाज ऐकूनच आला होता. त्याने जरा मन्या च्या शरीराकडे पाहिले. "साप विषारी होता. तोंडातून फेस येउन राहिलाय." त्याने झटकन त्याच्या पायाची दोरी सोडली. आणि ती मन्याच्या पायाला बांधली. जेणे करून विष शरीरात पसरू नये. त्याच्या जवळ असलेल्या ब्लेड ने एक चीर मारली पायावर. कडू निंबाच्या पाल्याचा रस करून त्याच्यात आणखी काही पानं मिसळून ते मन्याला पाजला. मग आम्ही तिघांनी त्याला अलगद उचलून गावात आणला आणि एकाच्या गाडीत बसवून त्याला तालुक्याला रवाना केला. मन्या वाचला. त्याच्या आजी ने तोंड भरून आशीर्वाद दिले गम्फाला. गम्फा मात्र हे ऐकण्या आधीच पुन्हा जंगलात पसार झाला होता.

या घटनेनंतर मात्र माझ त्याच्याबद्दल च मत पूर्ण बदलल. मी त्याच संध्याकाळी मुद्दाम त्याच्या झोपडीवर गेलो. त्याची झोपडी पाहून मी थक्कच झालो. चांगलं मोठ अंगण होता त्याला. अगदी स्वच्छ. सडा टाकलेला…
अंगणाच्या भोवती वेग वेगळी झाड. काही फूलांची … काही औषधी. झोपडीला दार नव्हतं. आत अंधार होता. आणि थोडासा धूर येत होता. गम्फा घरातच होता. मी आवाज दिला "आजोबा…".  गम्फा बाहेर आला. हसून म्हणाला तू आलास व्हय. . . ये बाबा. बस. त्याने अंगणात बाज टाकली. मला वर बसवून तो खालीच बसला. मी म्हणालो काय स्वयंपाक चालू आहे का? "व्हय… भाकर थापत होतो !!! तू कसा काय आलास हिकडे?"
"काही नाही… सहज …"  .      "सहज? इथ कोणी सहज येत नाही. आणि हे पहा. मला आजोबा म्हणू नकोस. नात्यात अडकायच नाही मला. मला गम्फाच म्हण. तुला दुपार बद्दल बोलायच आहे ना ?"

मी म्हणालो "हो… म्हणजे मी पहिल्यांदाच तुम्हाला इतक्या जवळून पाहिलं . मी जे तुमच्या बद्दल ऐकलं होतं ते … " मी जर अडखळतच बोलत होतो.

गम्फा म्हणाला  "ते काही सगळच खोटं नाही. काही खरं आहे. काही मीच लोकांना सांगितल आहे. हे खर आहे कि मी रात्री बेरात्री स्मशानात जातो. जंगलात जातो. अरे पण ते झाड पाला गोळा करायला. स्मशानात बेलाच झाड आहे. त्याची फळ आणतो मी… औषधी बनवायला. "

"पण ते भूत वगैरे"

"भूत? हाहाहा …" गम्फा मोठ्याने हसला. "एवढा शिकलेला ना तू? भूता वर विश्वास ठेवतो?  मी आज अठ्ठ्याहत्तर वर्षांचा आहे. आज जवळ जवळ साठ वर्ष मी जंगलात जातो. मला आज पर्यंत भूत काही दिसल नाही.  भूत माणसाच्या मनात असतं  रे. "

"मग हे अस एकट राहणं … गावाच्या बाहेर…"

"काय सांगू तुला? चांगलं घर होतं आमचं. बपाकडे पाच एकर जमीन  होती. खाउन पिउन सुखी होतो. पण साप चावून बाप गेला. आई आधीच गेली होती. सावकारानं  कर्जाच जाळ टाकलं … आणि जमीन हडप केली. गावात कोणी मला साथ दिली  नाही. गरिबाला कोणी वाली नाही .  एकटा जीव. मजुरी केली… पुढे लग्न झालं … पोरं झाली. चांगलं चालू होतं … पण खाण्यातून काय विष बाधा झाली देव जाणे … माझ्या डोळ्या समोर दोन्ही पोर  दगावली… बायको तालुक्याला नेईपर्यंत जगातून चालती झाली."

गम्फा आता स्वताःशीच बोलत होता… "माझ काही कशात मन लागेना … गावात सगळे  उलट सुलट बोलत सुटले… आधी आई बापाला खाल्लं … मग  बायको पोरांना … मला काही सहन होईना… मी सरळ उठलो आणि रानात निघून आलो. असा जंगलात राहतो म्हणून लोक काही बाही अफवा पसरवायला लागले. गोष्टी तयार करून सांगायला लागले. मला माणसांचीच चीड आलि. मी म्हनल - लोक म्हणतात ना मी भूताशी बोलतो… मग बोलतो मि. लोक घाबरतात न मला … चांगलंच आहे ना मला. घाबरतात म्हणून कोणी माझ्या जवळ येत नाहि. मलाही लोक नकोच होते. मग मीही लोकाना गोष्टी रंगवून सांगायला लगलो. मला विद्या प्राप्त आहे … भूत प्रसन्न आहे. लोक आणखी घाबरत… आणी दूर जात "

मी म्हणालो " पण मग ते लोक बरे कसे होतात? तुम्ही त्यांच भूत कस काढता?"

"अरे बाबा … तेंव्हाचा मी तुला हेच सांगून राहिलो. भूत माणसाच्या मनात असते. रोग माझ्या औषधाने बरा होतो. जंगलात राहून सगळी औषधी झाडं  पाठ झालीत मला. मी नुसतं  औषध दिल तर लोक म्हणतात… गम्फा मंत्र म्हण… मला काय मी म्हणतो मन्त्र. माणसाला जेन्वा खात्री वाटते कि मंत्राने भूत जाणार … तेंवा ते नक्की जाते."

मी म्हणालो … "पाटलाची म्हैस ?"

"अरे काही बाही खाल्ला असेल तिने… म्हणून दुध बंद झाल. पाटला न बकरी देलि. मी कशाला नाही म्हणतो ? मी काही मंत्र  फेकले. औषधी पाला खाऊ घातला. दुध पुन्हा सुरु झाल.  अरे हा काय नळ आहे का पाण्याचा ? पाहिजे तेंवा सुरु अन पाहिजे तेंवा बंद?

"बर आता बराच उशीर झाला. घराला जा. नाही तर लोक म्हणतील मी तुला नजर बंदी करून ठेवलाय इथे."

असा म्हणून गम्फा उठला. माझ्या हातात एक कसली तरी पुडी दिलि. आणि म्हणाला

"तुला अपचनाचा त्रास आहे ना? ही भुकटी घे. जेवण झाल्यावर खात जा पाण्यात मिसळून. "

"तुम्हाला कस  कळल?"

"अरे तेंवा पासून वास सोडून राहिलाय. "

असा म्हणून मोठ्याने हसला… आणि पुडी हातात घेऊन मंत्र  म्हणाला " ओम भट जय कालि. जय भूत नाथ."

मी पुडी घेतली… त्याला नमस्कार केला .

गम्फा म्हणाला " कल्याण हो… "